मुंबई नगरी टीम
मुंबई । अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे.काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत.रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत असा सवाल करीत,रामाच्या नावावर वसुलीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतला आहे का ? असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला.
नाना पटोले यांनी आज विधानसभेत राम मंदिराच्या देणगीचा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली.ते म्हणाले की,राम मंदिरासाठी पैसे मागितले आणि देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आली अशी तक्रार आपल्याकडेही आली आहे. भगवान श्रीरामाच्या नावावर महाराष्ट्रात पैसे मागितले जात आहेत.त्यांना असे पैसे गोळा करण्याचा काय अधिकार आहे ? राम मंदिरासाठी गोळा केला जाणारा पैसा कोणत्या धर्मादाय संस्थेकडून घेतला जात आहे तसेच राम मंदिरासाठी ३० वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला असे प्रश्न उपस्थित करून,त्याचा हिशेब भाजपने द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली.