मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य सरकारने राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी येत्या १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.मात्र किराणा किंवा भाजीपाला,फळे खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याचे चित्र असल्याने राज्य सरकारने आता किराणा दुकानासह भाजीपाला दुकाने,फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांसह, सर्व खाद्यपदार्थांचे दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याची अंमलबजावणी आज रात्री ८ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढ होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत राज्यातील किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आता सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने,फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाईची दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान ( त्यामध्ये चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी या दुकानांचाही समावेश आहे ) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने,पावसाच्या हंगामासाठी आवश्यक असणारी दुकाने साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील.मात्र या दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ८ पर्यंत मुभा असेल,परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम १३ एप्रिल रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत,जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील.परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे.हे बदल २० एप्रिल संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.