१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस पण केव्हापासून ! आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.मात्र मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार नसल्याने राज्यात येत्या १ मेपासून हे लसीकरण करण्यात येणार नाही असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत.जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे.आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.हा देशात विक्रम आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी येत्या १ मेपासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार नाही.मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होत नसल्याने राज्यात १ मेपासून लसीकरणाला सुरूवात होणार नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले आहे.मे अखेरीपर्यंत लस उपलब्ध झाल्यास हे लसीकरण करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू असून,त्यानुसार प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे टोपे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून,त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून,पाठपुराव्याने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये.लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleराज्यातला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला; ३० एप्रिलला घोषणा करणार
Next articleताई…मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धीर !