दरडी कोसळून ७६ जणांचा मृत्यू; ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात कोसळणा-या पावसामुळे कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर,सिंधुदुर्ग,ठाणे जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.मुसळधार पावसामुळे एकूण ८९० गावे बाधित झाले आहेत.तर दरड कोसळून ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनेत एकूण ५९ व्यक्ती हरविल्या आहेत.राज्यात विविध जिल्ह्यात दरड कोसळून एकूण ३८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत.या घटनेत मिळालेल्या माहितनुसार १६ घरांचे पूर्ण तर ६ घकांचे अंशत: नुकसान झाले आहे.पूर आणि दरडी कोसळून ७५ जनावरे दगावली आहेत.खबरदारीचा उपाय म्हणून ९० हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने मोठी जिवीत हानी झाली आहे.पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.राज्याच्या विविध ठिकाणी एनडीआरएफच्या एकूण २५ तुकड्या कार्यरत आहेत.( मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ ) भुवनेश्वरहून अधिकच्या ८ तुकड्या मागविल्या आहेत.या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ येथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.तटरक्षक दलाच्या ३ ,नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे तैनात करण्यात आल्या आहेत.रत्नागिरीत ६ ठिकाणी निवारे केंद्र उभारण्यात आली आहेत.त्यामध्ये २ हजार लोकांना हलविण्यात आले आहे.पावसामुळे चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला आहे.

अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आल्याने पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले.एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटनास्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.तळीये मधलीवाडी (ता. महाड),साखरसुतारवाडी,केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर या )३ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.

Previous articleतुम्ही स्वत:ला सावरा,बाकीचं आमच्यावर सोडा,आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू
Next articleपूरग्रस्तांना १० किलो गहू,१० किलो तांदूळ आणि पाच लिटर रॅाकेल मोफत देणार