तुम्ही स्वत:ला सावरा,बाकीचं आमच्यावर सोडा,आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू

मुंबई नगरी टीम

महाड । तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे.त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा.बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा.आम्ही तुमचं पुनर्वसन करू.सर्वांना मदत दिली जाईल,अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडी कोसळून नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावाला भेट दिली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे,मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर,खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.मुख्यमंत्री घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथील तळीये गावास भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी केलेला संवाद त्यावेळी ते बोलत होते.

हे आक्रीत घडलेले आहे,आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते.तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये,सरकार त्यांना सर्व मदत करेल,संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू असे सांगून,अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळयात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल.ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या.कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते.केंद्राने देखील सहाय्य केले,लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleराज्यातील बंधू-भगिनींच्या आपुलकीच्या शुभेच्छांमुळे भारावून गेलोय : अजित पवार
Next articleदरडी कोसळून ७६ जणांचा मृत्यू; ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले