अहमदनगर दुर्घटना : हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई नगरी टीम

मुंबई । अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते.व्हेन्टिलेटर मध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचे सूत्रांकडून समजते.या आगीची घटना कळताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान दुर्घटनेत १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर ७ रूग्णांना वाचविण्यास यश आले आहे.अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग ही दुर्घटना दुर्देवी असून,आगीत जीव गमावलेल्या रूग्णांना श्रद्धांजली अर्पण करतानाच मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवून,या दुर्घटनेचा चौकशी अहवाल आठवडा भरात देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

Previous articleचिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले होते ? नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट
Next articleपेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात महाविकास आघाडीकडून टाळाटाळ