तीन वर्षात ३ हजार ४१४ किलो अंमली पदार्थ जप्त; किती मुद्दे मालाची विल्हेवाट लावली ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । प्रत्येक वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे जप्त मुद्देमालाचे अखेर काय केले जाते आणि याची विल्हेवाट लावली जाते की नाही ? हा प्रश्न उपस्थित होत असतो.मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मागील ३ वर्षात ३४१४ किलो मुद्देमाल जप्त केला असून यांपैकी २०२१ साली जप्त केलेल्या २५९३ किलो पैकी फक्त २४८ किलो गांजा, एमडी आणि कोडेन याची विल्हेवाट लावल्याची माहिती उपलब्ध आहे तर मालाची माहिती गुलदस्त्यात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील ३ वर्षात जप्त केलेला मुद्देमाल आणि विल्हेवाटची माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अनिल गलगली यांस वर्ष २०१९, वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. वर्ष २०१९ मध्ये २५.२८ कोटींचा ३९५ किलो ३५ ग्रॅम माल तसेच १३४३ स्ट्रीप्स, ७५७७ बॉटल्स, १५५१ डॉट जप्त केला. पण या मालाची विल्हेवाट बाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. वर्ष २०२० मध्ये २२.२३ कोटींचा ४२७ किलो २७७ ग्रॅम माल तसेच १४ मिली ग्राम, ५१९१ बॉटल्स, ६६००० टॅब जप्त करण्यात आला होता. या मालाची विल्हेवाट लावली की नाही ? याचीही माहिती दिली नाही. तर २०२१ च्या २५ ऑक्टोबर पर्यंत ८३.१८ कोटींचा सर्वाधिक माल जप्त करण्यात आला ज्यात २५९२ किलो ९३ ग्रॅम माल तसेच १५८३० बॉटल्स,१८९ एलएसडी पेपर्स चा समावेश होता. विल्हेवाट लावलेल्या मुद्देमालात गांजा २४८ किलो ३४४ ग्राम, एमडी ०.०१० किलो ग्रॅम आणि ३६८ कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरप बॉटल्स आहे.

गलगली यांच्या मते वर्ष २०१९ आणि वर्ष २०२० ची माहिती दिलीच नाही आणि २०२१ मध्ये २४८ किलो मालाची लावलेल्या विल्हेवाटची माहिती दिली आहे. याबाबतीत आजही शंका असते आणि चर्चाही असते की पोलिस अधिकारी जप्त माल परस्पर विकतात आणि मोहास बळी पडतात. यासाठी प्रत्येक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे जेणेकरून अंमली पदार्थाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईत सामान्य मुंबईकर सुद्धा आपले योगदान देईल,या आशयाचे पत्र गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांस पाठविले आहे.

Previous articleभाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचे काय झालं ? राष्ट्रवादीचे नेते ईडीच्या कार्यालयावर धडकणार
Next articleराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कडाडले ! भाजपला दिला गंभीर इशारा