राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कडाडले ! भाजपला दिला गंभीर इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधिल दोन – चार मंत्र्यांना मुद्दाम बदनाम करुन आत टाकलात तर बाकीचे आमदार आहेतच की,आमच्याकडे कशाचीही कमी नसून,तुम्ही किती लोकांना बदनाम करणार असा सवाल करतानाच चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होवू नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

आज पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले.भाजप ऐनकेन प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे.हे सरकार लवकर जावं ही भाजपची इच्छा आहे मात्र देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करतोय त्यामुळे सरकार बरखास्त करायचा अधिकार कुणाला नाही शिवाय चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होवू शकत नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.विधानसभेतील बहुमत जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकार जाणं शक्य नाही असे सांगतानाच ईडीची धाड पडणं हे आता नित्याचंच झालं आहे. राज्यातील जनतेला भाजपच्या या खेळाची सवय झाल्याने याचं विशेष अप्रुप वाटत नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून भाजपकडून सर्व यंत्रणांचा वापर होतोय मात्र त्यांचं सरकार असतं तर एकदाही छापेमारी झाली नसती असा सणसणीत टोलाही पाटील यांनी लगावला.अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ज्या गोष्टी समोर आणल्या आहेत त्या धक्कादायक असून त्याबाबत एनसीबीने शहानिशा करायला हवी. खोटं प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे. या सगळ्या गोष्टीची शहानिशा एनसीबीने करावी अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.मलिक हे सातत्याने आवाज उठवत असल्याने शेवटी एनसीबीला आर्यन खान केस दुस-याच्या हातात द्यावी लागली.मलिक यांनी जे आंदोलन उभारले आहे त्या सर्वाला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleतीन वर्षात ३ हजार ४१४ किलो अंमली पदार्थ जप्त; किती मुद्दे मालाची विल्हेवाट लावली ?
Next articleकाँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहरे उत्साही व आनंदी तर भाजपाचे रागीट व भयग्रस्त दिसतात