धनंजय शिंदे, नाना पटोले, भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । ज्या बँकेचा नफाच १५-१६ कोटी आहे,तिचा घोटाळा २ हजार कोटींचा होणार कसा ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित करतानाच ज्यांनी अशा प्रकारचे बेताल आरोप केले, ते धनंजय शिंदे असतील, नाना पटोले असतील, किंवा भाई जगताप असतील, यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा यथावकाश करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई बँकेचा २०० कोटींचा घोटाला झाला, असा आरोप केला जात आहे, त्यावर प्रसारमध्यमांशी विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाना पाटोलेही बोलतात २ हजार कोटींचा घोटाळा झाला. मला यावर हसायला येते.धनंजय शिंदे जे आपचे आहेत, त्यांनी आपची प्रतिमा बेजबाबदार बनवली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

न्यायदेवता निश्चितपणे न्याय देईल यावर पूर्ण विश्वास

मुंबई उच्च न्यायालयाने १५ दिवसांचा दिलासा मला दिला आहे. मला न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण ही केस जबरदस्तीने पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकारने बनवली आहे. त्यामुळे न्यायालयात सुनावणी होईल, त्या वेळी न्यायदेवता मला निश्चितपणे न्याय देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे दरेकर यांनी सांगितले. आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी होती,त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.न्यायदेवता मला न्याय देईल. सत्र न्यायालयात मला तीनदा दिलासा मिळाला. शेवटी जामीन फेटाळला गेला. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील नेत्यांनी हा जो संकल्प मांडलाय त्याचे कारण त्यांचे काही नेते तुरुंगात आहेत, काही जाण्याच्या मार्गावर आहेत, असे असताना आपणही क्रियेला प्रतिक्रिया दिली पाहिजे. मग भाजपचा कुठला नेता आपल्याला अडकवता येतोय का? गिरीश महाजन यांच्या बाबतीत षड्यंत्र केले. मोहित कुंबोज, प्रसाद लाड यांच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही चिंता करत नाही. जर चुकीचे सांगितले असेल, तर तपास यंत्रणा तपास करून कारवाई करेल आणि न्यायालय उचित असा न्याय देत असते. त्यामुळे आम्ही सरकारच्या कुठल्याही दबावाला, दंडेलशाहिला दबणार नाही. जी प्रक्रिया असेल, त्या प्रक्रियेला सामोरे जाऊ आणि या सरकरविरोधात असलेला आवाज दाखवून देऊ, असे दरेकर यांनी सांगितले.

Previous articleअखेर ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे
Next articleदुकानांचे फलक मराठीत,दारूच्या दुकानाला महान व्यक्ती किंवा गड-किल्यांची नावे देता येणार नाही