मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर काल दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत चप्पलफेक केली.या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उ़डाली असतानाच राज्याच्या गृहविभागाच्या कारभारावरून खुद्द महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि विरोधी पक्षनेते यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची माहिती अगोदर माध्यमांना समजते मात्र याची माहिती पोलिसांना मिळत नाही अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
काल दुपारच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी आंदोलकांनी सिल्वर ओकच्या दिशेने चपला आणि दगड फेकले.या सर्व घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आता पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.पोलिसांच्या कारभारावरून महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यावर माध्यमांचे कॅमेरे पोहोचतात,पण आमचे पोलीस पोहचत नाहीत, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गृहखात्याला लक्ष केले आहे.शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. ही माहिती आधी माध्यमांना समजली आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात मुद्यावरून पोलिसांच्या अपशयावर प्रश्नचिन्ह उभे केले.गेल्याच आठवड्यात गृहविभागाच्या कामकाजावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त केली होती.आता खुद्द काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गृहविभागाच्या कारभारावरून नाराजी व्यक्त केल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची खुर्ची अस्थिर झाल्याची चर्चा आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काय म्हणाले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातले जेष्ठ नेते असून, कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी पवार यांचा पुढाकार असतो. एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचे राज्य सरकारवर वारंवार सांगत होते.परवा न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात जल्लोष करण्यात आला.त्यानंतर कालची घडलेली घटना दुर्दैवी आहे.आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. मात्र,दगडफेक करणे निषेधार्ह आहे. कर्मचा-यांना प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध घेवून हवा त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी करीत,गुप्तवार्ता विभाग खूप महत्त्वाचा असतो.पण पवारांच्या घरावर हल्ला होताना पहिली माध्यम पोहोचतात,पण पोलीस पोहोचत नाहीत.त्यामुळे माध्यमांची यंत्रणा जास्त म्हणावी लागेल.
पोलिस यंत्रणा कमी पडली हे सत्य : अजित पवार
पवार यांच्या घराजवळ माध्यम आंदोलकांसह पोहोचली.राज्याच्या पोलीस दलात वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळे विभाग असतात.कालच्या प्रकारामुळे ती लोक कुठे तरी कमी पडली. हे सत्य आहे’असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात गुलाल उधळून मिठाई वाटण्यात आली.यात मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात आले असतानाही सिल्व्हर ओकवर जाण्याचे काहीच कारण नव्हते.या ठिकाणी एकाने भाषण करताना १२ तारखेला बारामतीला जाणार आहे असे वक्तव्य केले होते.आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचली तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरे घेऊन तेथे पोहोचली होती.त्यामुळे माध्यमांनी असा प्रकार घडणार असल्याचे दाखवायला हवे होते.हि गोष्ठ माध्यमांना समजते मग संबंधित यंत्रणेला का याची माहिती काढता आली नाही ? असा सवाल अजित पवार यांनी करीत पोलिस यंत्रणा कमी पडली हे सत्य आहे’ असे पवार म्हणाले.
पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय ? : देवेंद्र फडणवीस
देशातील मोठ्या नेत्याच्या घरावर आंदोलक ठरवून जातात,तेव्हा पोलीस काय करत होते.काल घडलेल्या एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे,हे पोलिसांचे अपयश आहे असे सांगतानाच पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कालची घटना घडत असताना माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले मात्र आपले पोलीस उशीरा पोहोचले, याचे कारण काय ? असा सवाल फडणवीस यांनी केला. कालचे दृश्य अतिशय भयावह होते.त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.