आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यातील विविध भागात मनसैनिकांना अटक करण्याचे सत्र सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देवून खणखणीत इशारा दिला आहे.मनसैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे.त्या प्रकारे मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का ? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिले होते.त्यानंतर भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली.तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले हे कशासाठी असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.ध्वनिप्रदूषण करणारे,लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी त्यांची धरपकड केली आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे.संदीप देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पोलीस शोधत आहेत,जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत.महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी,दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन,तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.सत्ता येत-जात असते.कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Previous articleउत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना आयोध्येत पाय ठेवू देणार नाही
Next articleमहागाई,बेरोजगारी हटविण्यात केंद्र सरकारला अपयश;शरद पवारांचा मोदींवर निशाणा