मुंबई नगरी टीम
मुंबई । पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही विरोधकांनी घोषणाबाजी करीत विधानभवन परिसर दणाणून सोडला.आज विरोधकांनी गद्दार सरकारचा धिक्कार असो,ईडी सरकार हाय हाय,५० खोके, एकदम ओके,गद्दारांना भाजपाची ताट वाटी,चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी,अशा घोषणा दिल्या.मात्र या घोषणा देणा-या महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून,यातील काही आमदारांनी विकासावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे.तिन्ही पक्षातील काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत.तो दणकादेखील आपल्याला भविष्यात दिलेला दिसेल असा गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही विरोधकांनी सत्ताधा-यांच्या विरोधात विधानभवनाच्या पाय-यावर घोषणाबाजी केली.विरोधी पक्षाच्या आमदारांच्या या घोषणाबाजीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक माहिती आज माध्यमांना दिली.घोषणाबाजी करणाऱ्या गटात उभे असलेले काही आमदार लवकरच शिंदे गटात सामील होतील, असा गौप्यस्फोट मंत्री सामंत यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले,तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात पुन्हा लक्ष देवून बघितले तर लक्षात येईल की, किती लोक नाराज आहेत.किती तरी लोक हे नाईलाजाने त्या ठिकाणी बसले आहेत. नीट बघितल्यावर काही लोक तर घोषणाही देत नाहीत.त्यातील काही आमदारांनी विकासावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये तिन्ही पक्षातील लोक आहेत.जे लोक घोषणा देत नव्हते किंवा नाईलाजाने तिथे बसले आहेत त्यातील काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत.त्यांनी चर्चाही केली आहे.भविष्यात तुम्हालाही कळेल की,तो दणकादेखील आपल्याला भविष्यात दिलेला दिसेल असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.