‘त्या’ कंत्राटी एसटी चालकांना शासकीय सेवेत घ्या;धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई नगरी टीम

बीड । एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी बाह्य सांथेमार्फत ८०० कंत्राटी चालक नेमले होते,मात्र आता त्या सर्वांना आता काढून टाकण्यात येत असून,या सर्व कंत्राटी चालकांना राज्य शासनाने सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात ८०० खाजगी चालकांना एसटी महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी नेमणूक करून राज्यातील विविध जिल्ह्यात एसटी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्व ८०० लोकांनी आजतागायत दिवस रात्र सेवा दिली. मात्र त्या सर्वांची सेवा आता बंद करा, अशा स्वरूपाचे आदेश एसटी महामंडळाने आज पारित केले आहेत.ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवसरात्र काम केले आता त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. अचानक रोजगार गेल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ येऊ शकते.या अन्यायाबाबत काही कंत्राटी चालकांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडे निवेदन देखील दिले आहे.कठीण काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता वाऱ्यावर सोडून देणे योग्य नसून, त्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका ट्विट द्वारे केली आहे.

Previous articleशरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष; सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ पिंजून काढणार
Next articleशिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील यासाठी दक्षता घ्या : मुख्यमंत्र्यांच्या सूचना