मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने आणि काँग्रेस,राष्ट्रवादीने निवडणूक आयोग आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.विरोधकांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.निवडणूक आयोगाने शिवसेनेला अनेकदा वेळ दिला मात्र आपल्या मनासारखा निर्णय होत नसले तर शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रकारचे आरोप होत आहेत असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/wrNnC38WZ4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 10, 2022
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानंतर विरोधकांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे.शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या निर्णयला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.तर भाजप सत्तेचा दुरुपयोग करून इडी,सीबीआय प्रमाणे निवडणूक आयोगाचाही दुरुपयोग करत आहे असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.निवडणूक आयोगाने शिवसेनेला अनेकदा वेळ दिली.पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कधीतरी त्याला सामोर जावे लागते. आयोगाने दिलेला निर्णय हा अंतिम नाही तर अंतरिम निर्णय दिला आहे.त्यामुळे एखादे प्रकरण कमजोर असते तेव्हा केंद्रीय यंत्रणांवर हल्ला करायचा ही शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पद्धत आहे.आपल्या बाजूने निकाल दिला तर उत्तम अन्यथा संस्थाविरोधात बोलायचे, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
यापुर्वीही अनेक पक्षांमध्ये उभी फुट पडली तेव्हा मागील २५ वर्षातील निर्णय बघितले तर विरोधकांचा हा आरोप राजकीय असल्याचे स्पष्ट होते असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.राज्यात गुंतवणूकीचा ओघ वाढत असल्याचे सांगून कोकणात होणा-या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.