मुंबई नगरी टीम
जळगाव । निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.तर नवे चिन्ह घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटात चढाओढ सुरू असतानाच,उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या भांडणात भाजपला मजबूत होण्याची संधी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.शिवसेना संपवण्यासाठी भाजप सत्तेचा दुरुपयोग करून ईडी, सीबीआय प्रमाणे निवडणूक आयोगाचाही दुरुपयोग करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेनेचे धनुष्यबाण मोडले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.पक्षप्रमुख म्हणून काही चुका होत राहतात.यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याही चुका असू शकतात.मात्र एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा, आता तेही संपले आणि तुम्ही संपला,अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल,असे वाटत नाही, असे मत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या भांडणात भाजपला मजबूत होण्याची संधी असल्याचा दावाही त्यांनी केला.जळगाव मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली.या बैठकीनंतर खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना वाढवली.त्यांच्या कष्टामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली.बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती,त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले हे राज्याच्या दृष्टीने ही योग्य नाही मात्र दुसरीकडे या वादामुळे भाजपला मजबूत होण्याची संधी आहे,असा दावाही खडसे यांनी यावेळी केला.
दोन पक्ष आपसात भांडत राहिले आणि एकमेकांना शत्रू मानत राहिले तर त्याचा परिमाम राज्याच्या विकासावर होतो.प्रत्येक पक्षात अंतर्गत वाद असतात परंतु विकासासाठी प्रश्न घेवून एकत्र येण्याची भूमिका बजावली पाहिजे असे मत व्यक्त करतानाच शिवसेना संपवण्यासाठी भाजप सत्तेचा दुरुपयोग करून इडी,सीबीआय प्रमाणे निवडणूक आयोगाचाही दुरुपयोग करत आहे अशा शब्दात खडसे यांनी भाजपला लक्ष्य केले.