बिल्डर अजय आशर यांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्राच्या निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच अर्थात मित्रची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.आज या संस्थे करिता नियामक मंडळाचे गठन करण्यात आले असून,उपाध्यक्षपदावर अजय आशर आणि शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांची उपाध्यक्षपदी केलेली नियुक्ती वादात सापडली आहे.आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्राच्या निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था स्थापन करून या नियामक मंडळावरील नियुक्त्या नियोजन विभागाने जाहीर केल्या आहेत.त्यानुसार या नियामक मंडळावर अजय आशर आणि शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेले अजय आशर हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात.आशर यांच्या नियुक्तीने विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून,त्यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे.अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना पटोले म्हणाले की,राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नगरविकास विभागाचे निर्णय घेणारा अजय आशर नावाचा व्यक्ती कोण ? असा सवाल केला होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते व त्यांचाही असाच आक्षेप घेतला होता.आता त्याच लुटारु व्यक्तीची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकार निती आयोगासारख्या महत्वपूर्ण संस्थेत कॅबिनेट दर्जाच्या उपाध्यक्षपदी कशी करू शकतात ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का ? तसेच कर्नाटकला महाराष्ट्रातील काही गावे देण्याचा घाट घातला जात आहे, उद्योग गुजरातला जात आहेत तसेच राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय घेतला आहे का ? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली आहे.अजय आशर या व्यक्तीबद्दल भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आक्षेप घेतला होता. मग आता भाजपाचे मनपरिवर्तन झाले आहे का ? काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे ? या नियुक्तीमागे भाजपाचाही काही स्वार्थ आहे का ? याचा खुलासा झाला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा या महत्वाच्या पदावर एका लुटारूची नियुक्ती करण्यास तीव्र विरोध आहे.वेळ पडल्यास हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाजही उठवू असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

Previous articleशिवशक्ती भिमशक्तीला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे-जोगेंद्र कवाडे एकत्र येणार !
Next articleदेवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश : मुंबईतील उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा