पूरग्रस्त भागातील  “चुली” पुन्हा पेटणार!

पूरग्रस्त भागातील  “चुली” पुन्हा पेटणार!

मुंबई नगरी टीम

मुंबई  : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या हजारो कुटुंबियांच्या घरांमधील चुली आता पुन्हा पेटणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या सहकार्याने तब्बल ६० हजारांहून अधिक गॅस-शेगडी पूरग्रस्त कुटुंबीयांना वितरित केल्या जाणार आहेत. सोबतच गॅस दुरुस्तीसाठी दोनशेहून अधिक कुशल कारागीर हे पूरग्रस्त भागांमध्ये घरोघरी जाऊन गॅस शेगडींची मोफत तपासणी करणार आहेत.

महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच या संदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, महाराष्ट्र नॅचरल ऑइल अँड गॅस आदी कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.याबाबत  चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले कि, “पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करून पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”पूरग्रस्त भागातील नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन आघाड्यावर काम करण्यात येणार असल्याचे सांगताना  पाटील पुढे म्हणाले की, “पूरग्रस्त भागातील महिलांना छोटा गॅस सिलेंडर आणि शेगडी असे दोन्ही उपलब्ध करून देणे, किंवा फक्त शेगडी उपलब्ध करून देणे. तसेच पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करणे, याला प्राधान्य देण्यात आले आहे.”

“नुकताच निर्माण झालेल्या गंभीर पूर परिस्थितीमुळे हजारो घरांमधील गॅस आणि शेगड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत या पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून कुशल मेकॅनिक पूरग्रस्त भागांमधील प्रत्येक घरांमध्ये जाऊन गॅस आणि शेगडीच्या सुरक्षेबाबत खातरजमा करणार आहेत. तसेच नादुरुस्त शेगड्या व गॅस सिलेंडर संदर्भातील समस्या दूर करून नागरिकांचा संसार पुन्हा उभा करण्यात मोलाचा वाटा उचलणार आहेत.” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच, एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे यांनी बैठकीसाठी आणि या उपक्रमासाठी समन्वय करीत असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleदहीहंडी साजरी न करता पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत करा
Next articleसरकारचा दिलासा देणारा निर्णय : पूरग्रस्त शेतक-यांचे एक हेक्टरपर्यंतचे कर्जमाफ