“आता आम्ही जगावं की मरावं” ? ; शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा
मुंबई नगरी टीम
नाशिक : राज्यात परतीच्या पावसाने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील टाके-घोटी गावांना भेटी दिल्या. आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेले नाही अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शरद पवारांपुढे मांडली.
राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक वाया गेल्याने राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली.पवार यांनी शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी करत शेतक-यांची आस्थेने चौकशीही केली. यावेळी शरद पवार यांनी पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेले नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या पवार यांना सांगितली.