देवेंद्र फडणवीस यांचा गारपीट आणि पावसात प्रचार
मुंबई नगरी टीम
नागपूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पारशिवनी तालुक्यातील आमडीफाटा येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज पहिल्या सभेला संबोधित केले.गारपीट आणि पाऊस पडलेला असताना सुद्धा लोक मोठ्या संख्येने या सभेसाठी आले होते.त्यांनी आपल्या भाषणात राज्य सरकार टीकास्त्र सोडले.नागपूर आणि परिसरात पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
सत्तेत येण्यापूर्वी अवकाळीग्रस्त शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रूपये देऊ, असे शिवसेना सांगत होती,तर हेक्टरी ५० हजार रूपये देऊ असे काँग्रेस-राष्ट्रवादी सांगत होती.पण आज प्रत्यक्षात शेतक-यांचा विश्वासघात करून त्यांच्याशी बेईमानी केली जात आहे.नव्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही एखाद्या फसव्या जाहिरातीसारखी आहे. अटी-शर्ती लागू, असे जाहिरातीच्या खाली लिहिल्यासारखे ते जीआरमध्ये लिहिले आहे. शेतक-यांची मोठी फसवणूक होते आहे अशी टीका फडणवीस यांनी करून,आपल्या काळात २००१ ते २०१७ पर्यंतचे कर्ज माफ केले गेले होते. या सरकारने २ वर्षांचे कर्ज माफ करताना त्यातही अटी-शर्ती टाकल्या आहेत.ही लबाड सरकारची लबाडी आहे. आज मलाईदार खात्यांवरून भांडणं होत असताना कृषी खात्यासाठी कुणीही भांडताना दिसत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.