मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता “दहीहंडी” चा उत्सव यंदा साजरा करू नका असे आवाहन मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केले आहे.जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना महामारीला आळा घालूया अशी विनंती त्यांनी विविध बालगोपाळाना आणि मंडळांना केली आहे.
ज्या सणाची आपण वर्षेभर वाट पाहत असतो तो “दहीहंडी” चा सण लवकरच येत आहे, मी स्वतः “गोविंदा” असल्याने या सणाचे असलेले महत्त्व व उत्सुकता जाणून आहे असे सांगतानाच,मनसे पक्ष हा कायमच सर्व हिंदू सण थाटात,उत्साहात साजरे करावे ही भूमिका वर्षानुवर्षे मांडत आला आहे.आम्ही कायमच या सणासाठी,त्यात असलेल्या विविध अडचणी, प्रसंगी गोविदांनी किती थर लावावे हा मुद्दा मांडला होता. अशा प्रत्येक वेळी गोविंदांच्या बाजूनेच ठामपणे मनसे पक्ष कायम उभा राहिला असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.सध्या राज्यात कोरोनाची परंतु परिस्थिती आहे, या कोरोना महामारीमुळे यावर्षी आपण सर्वांनी जाहीर “दहीहंडी” चा उत्सव साजरा करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावर्षी जरी आपला हिरमोड होणार असला तरी पुढील वर्षी हा उत्सव जल्लोषात व उत्साहात साजरा करून ती कसर भरून काढू परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना महामारीला आळा घालू अशी विनंती त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील “दहीहंडी” साजरी करणाऱ्या मंडळांना व बालगोपाळाना केली आहे. यासंदर्भात मी स्वतः फोन द्वारे मुंबई ‘दहीहंडी समनव्य समितीतील अनेक सदस्यांशी चर्चा केली असल्याचे नांदगावकर यांनी सागितले.