राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज ! मंत्र्यांकडे वेळ मागूनही मिळत नाही : सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात गेल्या अडीच महिन्यापासून कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही.लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी गेली १५ दिवस मंत्र्यांकडे वेळ मागत आहे पण वेळ मिळत नाही अशी खंत व्यक्त करतानाच,सध्या सणवार सुरु असल्याने मुख्यमंत्री सध्या गणपती दौ-यावर आहे.त्यामुळे एक कार्यक्रमाला जाण्यासाठी आणि एक मंत्रालयात बसून काम करण्यासाठी असे राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

भाजपने खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रीय केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.एक देश एक पक्ष असे भाष्य भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केले होते. पण संविधानावर माझा विश्वास असल्याने एक देश,अनेक पक्ष असा विचार आहे.त्यामुळे भाजपने नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे मानपासून बारामतीत स्वागत करते असे सुळे म्हणाल्या.राज्यात गेल्या अडीच महिन्यापासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत.एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक मंत्र्यांकडे वेळ मागत आहे पण त्यांच्याकडून वेळ मिळत नाही अशी खंत व्यक्त करून,त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे.त्यामुळे प्रशासना बरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे असेही त्या म्हणाल्या.पैसे आणि ईडीच्या माध्यमातून राज्यात ओरबाडून सत्ता घेतली.सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करतील अशी अपेक्षा होती.मात्र गेल्या अडीच महिन्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचा कुठलाही निर्णय घेतला नाही असे ताशेरेही त्यांनी सरकारवर ओढले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल केला.राज्यात सध्या सण असल्याने मुख्यमंत्री गणपती दर्शनाच्या दौ-यावर असल्याने एक मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसण्यासाठी असे राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सध्या बेरोजगारी,महागाई हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतर प्रकल्प राबवण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी चर्चा होणे अपेक्षित आहे,असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सध्या केंद्रीय यंत्रणांचा वापर हा राजकीय विरोधकांना नामोहरन करण्यासाठी होत आहे. हे सध्या देशात सामान्याने सुरू झाले आहे.मात्र जे पक्ष सोडून भाजपात गेले आहेत त्यांची चौकशी थांबते असे वक्तव्य भाजपचेच नेते करतात.त्यामुळे हे वास्तव देशाला दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या.बारामतीत अनेक संस्था,शाळा यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळे निर्मला सितारामन यांना वेळ असेल तर त्यांना हे काम मी स्वत : दाखवेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.लोकशाहीत प्रत्येकाला पक्षाची ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचे सांगून,खासदार राहुल गांधी यांची सुरू असलेली पदयात्रा ही जनतेसाठी आहे. सर्वसामान्य माणसाला जेव्हा अडचणी येतात तेव्हा पदयात्रा काढाव्या लागतात असे सांगून सुळे यांनी राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे समर्थन केले.

Previous articleसरन्यायाधीशांनी केलेल्या प्रश्नांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला
Next article‘ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही’…अजितदादांनी उडवली बावनकुळेंची खिल्ली