वाचा : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात काय म्हणाले..मंत्री उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई  : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी  विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगतानाच,अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने १८,१९,२० सप्टेंबर २०२० रोजीचा वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव तीन दिवसांच्या कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

आज मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे.तसेच सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.असेही सामंत यांनी सांगितले.अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने  १८,१९,२० सप्टेंबर २०२० रोजीचा वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव तीन दिवसांच्या कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही  सामंत यांनी यावेळी सांगितले.

सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख  ४७ हजार  ५०० अशी आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे १ लाख  ७० हजार विद्यार्थी असून उर्वरित ७२ हजार ५०० हे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील.मुंबई विद्यापीठाने आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा  १५ सप्टेंबर  पासून सुरू केल्या असून २५ सप्टेंबर २०२० पासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही  सामंत यांनी सांगितले.

Previous articleमुंबईत चार पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कारवाई
Next articleयेत्या आठवडयात एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यास आंदोलन छेडणार