नवरात्रीत गरबा,दांडिया खेळण्यास बंदी ;गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये दररोज वाढ होताना दिसत आहे.राज्यातील ग्रामीण भागातही रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरनाच्या कालावधीत आलेले सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले मात्र गणेशोत्सवानंतर रूग्णांच्या संख्येतील वाढ पाहता येत्या १७ ऑक्टोंबर पासून सुरू होणारा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीन साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले असून,या नवरात्रीत गरबा,दांडिया खेळण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

येत्या १७ ऑक्टोंबर पासून सुरू होणा-या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.राज्यातील कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून या वर्षीच्या नवरात्रीत गरबा,दांडिया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव,दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका,स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक असणार आहे.तसेच मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

गरबा,दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत.त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत.शिबीरे  आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया,डेंग्यू इत्यादी शिबीरे आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू,संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची,पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

 आरती, भजन,किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये,तसेच मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई करण्यात आली आहे.मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Previous articleऊसतोड कामगारांची नोंदणी व महामंडळाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
Next articleमुंबईतील लोकल सेवा केव्हा सुरू होणार ; आदित्य ठाकरेंनी दिले महत्त्वाचे संकेत