मुंबई नगरी टीम
बीड : माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केले होते.त्या पार्श्वभूमीवर आज होणा-या दसरा मेळाव्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या मात्र माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय मंत्री पंकजा मुंडे यांनी आज भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भगनाव गडावर आज झालेल्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे असे आवाहन केले होते.मात्र आज झालेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणात पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे.मी आता भाजपची राष्ट्रीय मंत्री झाली असल्याने पक्षाच काम देश पातळीवर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तुम्ही धीर सोडू नका,कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही.पक्षाचा विचार मोठा असतो,पण गोपीनाथ मुंडेसाहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले, साहेबांचे नाव पक्षातलेच नाही तर विरोधी पक्षातले लोकंही घेतात,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आजचा दसरा मेळावा हा ऑनलाईन मेळावा असतानाही राज्याच्या कानाकोप-यातून या मेळाव्या लोक आले आहेत.सध्या माझ्याकडे कोणतेही पद नसता एवढी गर्दी झाली.विधानसभेची निवडणूक झाल्यावर पंकजा मुंडे संपल्या असे काही लोकांना वाटत होते.मात्र ज्यांना असं वाटतं त्यांनी आज जमलेली गर्दी बघावी असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.मी मंत्री असताना वाट्टेल तेवढा निधी द्यायचे,निधीच्या रूपात पैशांचा पाऊस पाडला असे सांगतानाच यापुढे रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरकारने कलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याचे धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे.तसेच या सरकारला जाब विचारण्याचेही धारिष्ट्यदेखील माझ्यात आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझे जीवनच तुम्हाला अर्पण आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मुंडे साहेब हे जिल्हा परिषदेलाही उभे नव्हते.राज्यात भाजपाचे सरकार येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते,त्या काळात मुंडे साहेबांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली.तेव्हा मित्रांसोबत बसून,मी शिवाजी पार्क भरुन सभा घेणार, असे बोलले होते. मुंडे साहेबांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप त्यावेळी शिवाजी पार्कवर झाला. त्यामुळे शिवाजी पार्कवर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही,असे सांगत त्यांनी शिवाजी पार्कवर शक्तिप्रदर्शनाची इच्छा कार्यकर्त्यांपुढे त्यांनी ठेवली. मला एकदा मुंबईतले शिवाजी पार्क भरून दाखवायचे आहे,असा निर्धारही या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.