तब्बल ७ वर्षानंतर प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार;उदय सामंत यांचा मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील प्राध्यपकांनी २०१३ मध्ये केलेल्या ७१ दिवसांच्या संप काळातील वेतन त्यांना तब्बल ७ वर्षानंतर मिळणार आहे.याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.याची माहिती त्यांनी ट्वीट करत आहे.त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील प्राध्यपकांमध्ये आनंदाचे वातावरण असून,सामंत यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यातील प्राध्यापकांचे दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ ते दिनांक १० मे २०१३ या ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.याचा फायदा राज्यातील १२ हजार ५१५ अध्यापकांना होणार असून एकूण १९१.८१ कोटी थकीत वेतन त्यांना मिळणार आहे,” असे ट्वीट राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.राज्यातील प्राध्यापकांनी वेतन वाढ आणि इतर प्रलंबित प्रश्नांसाठी ४ फेब्रुवारी २०१३ पासून बेमुदत संप सुरू केला होता. यानंतर १० मे २०१३ रोजी सरकार आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने हा संप सुरु होता. हा संप संपल्यानंतर राज्य सरकारने आंदोलन काळातील प्राध्यापकांचा पगार दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

सरकारच्या निर्णयानंतर प्राध्यापक संघटनांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेविरोधात उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही प्राध्यापकांच्या बाजूने निकाल लागला. यामध्ये प्राध्यापकांना त्यांचा ७१ दिवसांचा पगार द्यावा. तसेच या रकमेवर ८ टक्के व्याज द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते.या आदेशानुसार प्राध्यापकांना संप काळातील ७१ दिवसाचा पगार दिला जाईल,अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

Previous articleझोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा अशोक चव्हाण यांचे आवाहन
Next articleओबीसी प्रश्नांसदर्भातील बैठकीत पदभरती,शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा