मुंबई नगरी टीम
पुणे । केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपवर निशाणा सादणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.केंद्रात जसे एक पप्पू आहेत,तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत.त्यांच्या तोंडाला येईल,तसे बोलतात,असा टोलाही पाटील यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल,डिझेल,गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रीमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे,अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.पटोले यांच्या या टीकेचा खरपूस समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेत,पाटील यांनी नाना पटोले यांना महाराष्ट्राचा पप्पू म्हटले आहे.केंद्रात जसे एक पप्पू आहेत,तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत.त्यांच्या तोंडाला येईल,तसे बोलतात असा टोला पाटील यांनी लगावला असल्याने भाजप विरूद्ध काँग्रेस असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.