कोरोना रूग्णांची संख्या वाढली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला ८ लाख डोसेस देत होतो, सद्या ५ लाख डोसेस दिवसाला दिल्या जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.डॉ व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की ८ डिसेंबर रोजी ६२०० सक्रिय रुग्ण होते . मात्र आज १० हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या २० दिवसांत सक्रिय रुग्णांत ५० टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट १.०६ टक्के झाल्याचेही ते म्हणाले

Previous articleअध्यक्षांची निवडणूक उद्याच,आवाजी मतदान पद्धतीनेच होणार; सरकारचे राज्यपालांना आव्हान
Next articleअजित पवारांची विधानसभेत घोषणा : वढू बुद्रुक येथे होणार संभाजी महाराजांचे प्रेरणास्थळ