मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अडीच वर्षे शिवसेनेचा तर पुढील अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री अशी बोलणी झाली होती आणि त्याच आधारावर शिवसेना भाजपची युती झाली होती. मात्र त्यावेळी भाजपने हे आश्वासन पाळले नाही. नाहीतर नाहीतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात युवासेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे बोलत होते.शिवसेनेतील फुटीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला.आम्ही त्यांना आमचे समजत होतो.गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे असलेले नगरविकास खातं हे आम्ही त्यांना दिले होते असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्याच्या आधारावर युती झाली होती.मात्र हे आश्वासन भाजपने पाळलं नाही.नाहीतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते असेही आदित्य ठाकरे म्हणाले.यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीवरही भाष्य केले. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील.आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही असा हल्लाबोलही त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केला.