मुंबई नगरी टीम
नागपूर । राज्यातील विकासकामे गुजरात,कर्नाटकची आहेत का ? असा संतप्त सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या काळात विकास कामे थांबवली नव्हती मात्र राज्यात शिंदे फडणवीस आल्यावर ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली असा हल्लाबोल पवार यांनी केल्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.घोषणाबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आगमन झाले.मुख्यमंत्री शिंदे हे सभागृहात येताच माजी मंत्री,आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.खोके सरकार हाय हाय…ईडी सरकार हाय हाय अशा घोषणा त्यांनी दिल्या.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गोंधळामुळे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रश्नी विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यावर कामकाज सुरू झाले. त्यापूर्वी विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्दा उपस्थित करीत ठाकरे सरकारच्या काळात मंजूरी देण्यात आलेल्या विकास कामांना शिंदे- फडणवीस सरकारने दिलेल्या स्थगितीवरून हल्लाबोल केला.या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली.सरकार येते आणि जाते.तुमची एक टर्म आहे माझी १७ टर्म आहे.यापूर्वी विकास कामांना स्थगिती दिली नव्हती वि असे विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगू,राज्यातील विकासकामे गुजरात,कर्नाटकची आहेत का ? असा संतप्त सवाल केला. अजित पवार यांनी आक्रमक पणे मांडलेल्या या मुद्द्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येवून सरकारच्या विरोधीत जोरदार घोषणाबाजी केली.नही चलेंगी,नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी..ईडी सरकार हाय हाय अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
विधानसभेत गोंधळाला सुरूवात होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. मात्र यापूर्वी शांत असणारे आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे आमगन होताच आक्रमक झाले. खोके सरकार हाय हाय…ईडी सरकार हाय हाय अशा घोषणा त्यांनी दिल्या. आदित्य ठाकरे यांच्या घोषणाबाजीला विरोधी पक्षाच्या आमदारांनी साथ देत घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. मुख्यमंत्री उत्तर देण्यासाठी उभे राहताच आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आणि पुन्हा एकदा विरोधकांनी तुफान घोषणाबाजी केली.पाच महिन्यापूर्वी आम्ही एक मोठे ऑपरेशन केले आहे.यापुढेही छोटे छोटे ऑपरेशन करू असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगवला.यापूर्वीच्या सरकारने दुर्लक्ष केल्याने अशी परिस्थिती ओढवली आहे.आता आमचे सरकार आले असल्याने मुंबईची आरोग्य सुविधा सुधारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यांनतर विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला.या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रश्नी विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यावर सभागृहाचे कामकाज सुरू झाले.