राज ठाकरेंचे आवाहन : कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका
मुंबई नगरी टीम
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्याच्या तणावातून प्रवीण चौगुले या मनसैनिकाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन केले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर ठाण्यातील प्रवीण चौगुले या मनसैनिकाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी टोकाचे पाऊल न उचलण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. प्रवीण चौगुले हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचंड चाहता होता.मनसेचा कोणताही कार्यक्रम वा आंदोलन असो प्रविण चौगुले स्वत:च्या शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून सर्वात पुढे असायचा.आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझे मन व्यथित झाले आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होते. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका असे कळकळीचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
प्रवीण चौगुले याचे जसे माझ्यावर, पक्षावर प्रेम होते तसेच तुम्हा सगळ्यांचे माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे. पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की.ईडी सारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरे देईन. म्हणून मी पुन्हा सांगतो, तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असे मला कळले, तुमचे खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही. आणि काल मी जे सांगितले तेच पुन्हा सांगतो तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या. बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.