२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’…मलिकांचा राणेंना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावून येत्या मार्चमध्ये भाजपचे सरकार येईल असा दावा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीने राणे यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.भाजपचे नेते यापूर्वी भविष्यवाणीने सरकार पाडत होते आता नवसाने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा अनागोंदी कारभार सुरू असून, भाजपचे सरकार नसल्यामुळे हे होत आहे. असे सांगतानाच येत्या मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल.असा दावा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राणे यांचा समाचार घेतला आहे.बोकड,कोंबड्या ठेवून आणि नवसाने सरकार पडत नाही किंवा बनत नाही.सुरुवातीला भविष्यवाणीने सरकार पाडत होते आता नवसाने पाडण्याचा प्रयत्न होतोय परंतु त्यांनी या भ्रमात राहू नये असा सबुरीचा सल्ला मलिक यांनी भाजपला दिला आहे.सरकार पडेल अशी भविष्यवाणी करुन देवेंद्र फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार पडणार अशा घोषणा करायला लागले.आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचे टेंडर घेतले आहे.काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागतंय,अशा आशयाचे ट्वीट करत नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या मनसुब्यावर जोरदार टीका केली आहे.

२३ वर्षापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या व बोकडासाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतंय असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी राणे यांना लगावला आहे.आमचे आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर २५ वर्षासाठी टिकेल असे जाहीर केले याची आठवणही मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे. भाजपचे जुने नेते आता थकले आहेत आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे ते बोलतील परंतु त्याने सरकार जात नाही असा जबरदस्त टोलाही मलिक यांनी लगावला.

Previous articleएकदाचं ठरलं ! हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार
Next articleराणेंनी मार्च ही जास्तच मुदत दिली …..जयंत पाटलांचा नारायण राणेंना टोला !