मुंबई नगरी टीम
मुंबई । बंडखोर आमदारांच्या मतदार संघात दौरा करून बंडखोर आमदारांना घाम फोडणारे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा तिसरा टप्पा ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव,मालेगाव,नाशिक आणि भिवंडी ग्रामीण येथे आयोजित करण्यात आला होता मात्र आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्या शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा तर बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिव संवाद यात्रा काढून बंडखोरांना इशारा दिला आहे. कोकण, कोल्हापूर सातारा,पुणे दौ-यानंतर आदित्य ठाकरे हे ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव,मालेगाव,नाशिक आणि भिवंडी ग्रामीण या ठिकाणी दौरा करणार होते.आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.दरम्यान आदित्य ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक,आणि भिवंडीकरांची दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे .