भाजपने ओबीसींचे नेते भुजबळांना तुरुंगात तर एकनाथ खडसेंना घरी घालवण्याचे काम केले

मुंबई नगरी टीम

लातूर । ओबीसींच्या नेतृत्वाला संपवण्याचे काम भाजपने केले तेच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढत आहेत याच्यासारखा विरोधाभास नाही,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टिकास्र सोडले. लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर जयंत पाटील बोलत होते.

आज भाजपचे नेते ओबीसी आरक्षणावर गळा काढून घोषणा देत आहेत त्याच भाजपने ओबीसी नेते छगन भुजबळ यांना अडीच वर्षे तुरुंगात बसवले तर दुसरीकडे एकनाथ खडसेंसारखा ओबीसी नेता घरी घालवण्याचे काम केले असा घणाघाती आरोपही जयंत पाटील यांनी केला.ओबीसी आरक्षणाबाबत आमचे नेते छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. २०११ – १२ मध्ये ग्रामविकास मंत्री असताना सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याची आकडेवारी दिल्लीला पाठवलेली होती. त्याचे एकत्रीकरण करून २०१४-१५ मध्ये जाहीर व्हायला पाहिजे होते. ती आकडेवारी जाहीर न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने वारंवार मागणी करूनही आकडेवारी देण्यात आली नाही त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षणावर गदा आली. मात्र आज भाजपचे नेते ओबीसी आरक्षणावर गळा काढून घोषणा देत असल्याचे पाटील यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आहे अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.आधुनिक जगात पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना जगाच्या पाठीवर कुणी अस्तित्वात आणली असेल तर ती लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज यांनी आणली अशा शब्दात जयंत पाटील यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

Previous articleसूत्रे आमच्याकडे सोपवा,४ महिन्यात आरक्षण नाही दिले,तर राजकीय संन्यास घेईन
Next articleओबीसींचे आरक्षण परत मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार : पंकजा मुंडेंनी ठणकावले